Friday, 16 May 2025

गिरनार दत्तात्रेय पादुका दर्शन...आदेश ,आनंद , अनुभव आणि अनुभूती..*

*गिरनार दत्तात्रेय पादुका दर्शन...आदेश ,आनंद , अनुभव आणि अनुभूती..*

श्रद्धा आणि भक्ती या द्वैताचं अद्वैत अर्थातच श्रद्धेचं भक्तिमध्ये परिवर्तन होताना गेल्या आठवड्यात मी अनुभवलं .

मी फार श्रद्धाळू आहे असा भाग नाही पण समजायला लागल्यापासून विश्वाला चालवणारी एक वैश्विक शक्ती आहे आणि तिने हे जग निर्माण केलंय
 if there is a creation then there must be a creator यावर माझा ठाम विश्वास.
त्यामुळे त्या निर्मात्यासमोर मी सतत नतमस्तक असते.

 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशासाठी हा उहापोह?

तर सुरुवातीला म्हटलं तसं की माझ्या या विश्वासाचं वा श्रद्धेचं भक्तित रूपांतर होणारा एक अनुभव आज तुम्हाला सांगायचं आहे.

 अनुभवापेक्षा त्याला  अनुभूतीच म्हणूयात...
कारण अंतर बाह्य बदल करण्याची क्षमता त्यातआहे.

  मे महिन्याची सुट्टी लागली आणि कुठेतरी बाहेर जाऊया असा विचार सुरू झाला. 

गेली चार-पाच वर्ष मला गिरनार दर्शन करायचे  असा हट्ट मी नवऱ्याकडे करत होते.
 कारण गिरनार बाबतीत इतरांचे अनेक अनुभव मी सोशल मीडियात ऐकले होते पाहिले होते.

खरं सांगू ...बरेचदा ते अतिरंजित वाटायचे पण तरीही कुठेतरी कुतूहल निर्माण होत होतं.
या कुतूहलापोटी हे अनुभव आपल्यालाही अनुभवायला मिळावेत  ही एक सुप्त इच्छा मनात निर्माण झाली होती.

युट्युब वर, गुगल वर आम्ही सगळी माहिती घेतली होती पण काही केल्या गिरनार वारी काही ठरत नव्हती.

 या सुट्ट्यांमध्येसुद्धा पुन्हा ती इच्छा प्रबळ झाली आणि मी नवऱ्याकडे हट्ट धरला.

"पण ट्रेन बुकिंग खूप आधी करावे लागते आत्ता वेळेवर मिळणे अतिशय कठीण आहे. या साठी खूप आधीच नियोजन हवे होते ."
इति माझे यजमान.



 त्यांचेही बरोबर होतं म्हणा. इतक्या वेळेवर ट्रेन  बुकिंग मिळणं कठीण होतं आणि 17 तास सलग बस ने प्रवास व्यवहार्य वाटत नव्हता.

पण स्त्री हट्टा पुढे त्यांनी शेवटी ,

"आपण आपल्या कारने जाऊ."

असा सुवर्णमध्य त्याने साधला.

परंतु ठाणे ते जुनागड मार्गे गिरनार .हे जावून येवून तब्बल 2000 km..अंतर.....आणि या साठी आमच्याकडे फक्त 2 दिवस होते....म्हणजे पोचण्यासाठी सलग 17 तास कार ड्राईव्ह करणे आलेच.....

"हरकत नाही करूया प्रवास"
 असा निर्णय जवळपास झाला आणि माझा एक विद्यार्थी.. वेदांत जामगावकर जो नियमित गिरनार ला जात येत असतो तो भेटला......

"मॅडम ,कार ड्राईव करत जाऊ शकाल हो, पण गिरनार  रोप वे सुरू असला तरीही पुढच्या 5 हजार पायऱ्या चढून आणि उतरून खाली आल्यावर ...लगोलग परत 17 तास ड्राईव्ह करणे कठीण नाही तर अशक्य आहे!"

आणि पुन्हा गिरनार भेटीचा हा मार्ग पण आम्ही रद्द केला.
पुन्हा मन खट्टू झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहज म्हणून नवऱ्याने रेल्वे बुकिंग अँप उघडले आणि next day ची  सौराष्ट्र एक्सप्रेसची जुनागढ साठी तीन AC बर्थ तत्काळ मध्ये कन्फर्म मिळाले.

इतके दिवस ठरवून जे होत नव्हते ते अचानक पणे 24 तासावर घडणार होते.

थोडक्यात *आदेश* आला होता. 

मग काय "दत्त दर्शनाला जायचं. आनंद पोटात माझ्या माईना." अशी मनाची अवस्था! 

तयारी साठी अवघे काही तास होते आणि आमची काहीच तयारी नव्हती....पटपट जमेल तशी बॅग भरली...

दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवार सहा मे, दुपारी दोन वाजता बोरिवलीला सौराष्ट्र मेल ने जुनागडच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.
 
कालपर्यंत कसं जायचं ? 
कसं सगळं जमणार ? 

या विवंचनेत असलेले आम्ही दत्तगुरूंच्या जणू आदेशाने त्यांच्या भेटीला निघालो होतो.

इतक्या पायऱ्या चढ उतार करायच्या आहेत....  
कसं असेल वातावरण ?
कारण गिरनारला  जाण्याचा सर्वोत्तम काळ हिवाळा किंवा पावसाळा..... मे च्या रणरणीत उन्हात शक्यतो टाळले जाते...
कारण सूर्य आग ओकत होता....
आम्हाला त्रास होईल का? 
अशा प्रश्नांचे काहूर मनात घेऊन ट्रेन सोबत आमच्या कल्पनांचा वेग ही वाढत होता.

 ट्रेन मधे गप्पा, जेवण करून थोडीशी  झोप हवी म्हणून पहाटे चारचा गजर लावलेला.
पण त्या आधीच मध्यरात्री ट्रेन चा डबा जागा झाला.....भारताने पाकिस्तान वर हल्ला केलाय...मिशन सिंदूर सुरू झालय.....ही चर्चा सुरू झाली.

आता आम्ही सौराष्ट्र मध्ये होतो.

त्यावेळी हे ऐकल्यानंतर मनाची चलबिचल नाना शंका कुशंका, पुढे काय होईल ?  ही अनिश्चितता... 

सगळे एकदम धावून आलं....आणि सगळ्याची झोप उडाली.
"जुनागड यायला किती वेळ आहे?  " 
याचे उत्तर
" गाडी एक दीड तास लेट धावत आहे ." 

एक वाक्य मला घाबरवण्यासाठी पुरेसं होतं.

 ज्याने बोलवलं आहे त्याचाच धावा केला. 

सरतेशेवटी पावणेसहाला आम्ही जुनागड स्टेशनवर उतरलो. .

प्रवासातच एक गाडी सांगून ठेवली होती ..ती आम्हाला जुनागढ स्टेशनवर  घ्यायला आली.
परिसरात एक वेगळा तणाव जाणवत होता, वर्दळ ही फारशी नव्हती

गाडीवाल्याचे  नाव होतं  ' राम' 
माझं चित्त शांत व्हावं म्हणून त्या रामानं या रामाला माझ्यासाठी पाठवल असाव अशी मनाची समजूत काढली.

 15 मिनिटात 6 ते 7 km अंतर पार करून आम्ही  गिरनाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल मंगलम् मध्ये सकाळी साडेसहा दरम्यान चेक इन केलं.

 फ्रेश होऊन नाश्ता झाला आणि सोमनाथ दर्शन करून येण्याचं ठरलं...
 आता तुम्ही म्हणाल की गिरनार बद्दल सांगताय, त्यासाठी एवढा तुमचा आटापिटा चाललाय, आणि पायथ्याशी येऊन सोमनाथ कशासाठी ?

याचे कारण म्हणजे
 मला गुरुवारीच गुरुशिखरावर जाऊन पादुका दर्शन  घ्यायच होतं. 
आज होता बुधवार आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आणि योगायोगाने मोहिनी एकादशी सुद्धा होती.
 हे दोन्ही योग मला साधायचे होते म्हणून बुधवारी गिरनारला  शिखर चढाई न करता  गुरुवारी सकाळी जाव असं ठरवलं होते आणि आज इथून 80  ते 90 किलो मीटर वर असलेल्या सोरटी सोमनाथ दर्शनासाठी आम्ही निघालो.

  गाडी तीच होती पण आता चालक बदलला होता.
श्री.कैलेश रावत ,साधारण 60 ते 62 वय..
प्रवासात समजलं की ते एका गुजराथी माध्यमाची शाळा चालवतात....त्यांचा मोठा मुलगा कॅनडात शिकत आहे  तर दुसरा एमबीए करतोय आणि यांचा स्वभाव  गोष्टी वेल्हाळ, माणसाशी बोलायची आवड म्हणून वेळ मिळेल तसे ट्रॅव्हल्स गाडी चालवतात....गुजराती बांधवांच्या या श्रमप्रतिष्ठा, आत्मनिर्भर आणि कष्टाळू वृत्तीबद्दल खरंच मनात कौतुक दाटून आलं.

 दोन तासात आम्ही वेरावळ बंदरापासून जवळ प्रभास पटण ..म्हणजे सोमनाथ इथे आलो.

या ठिकाणी कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले, अतिशय देखणं आणि वैभवशाली असं मंदिर आपल्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देत दिमाखात उभ आहे.

 शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक विश्वप्रसिद्ध सोमनाथाचे मंदिर !

अतिशय स्वच्छ परिसर, उत्तम नियोजन, येणाऱ्या भक्तांची काळजी घेण्यासाठी घेतलेली खबरदारी ,साऱ्या गोष्टी मनाला मोहित करत होत्या

 पण मला सर्वात जास्त आकर्षून घेतलं ते मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या बाणस्तंभाने !

भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील स्थित या मंदिराच्या डाव्या बाजूला एक दिशादर्शक बाण आहे. 
 ज्यावर *"आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत आबाधित ज्योतिर्मार्ग*" असा श्लोक कोरला आहे .

याचा अर्थ असा की ,
"या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषमार्गात जमिनीचा एकही तुकडा  नाही, अडथळा नाही."

6 शतकाच्या इतिहासात या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो, पण त्यापूर्वी तो नेमका कधी स्थापिला याचा अंदाज नाही. 

आज अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान, ड्रॉन, उपग्रह वापरून हे विधान सत्य आहे याचा पडताळा आला आहे. 

 तो स्तंभ पाहून मी अक्षरशः स्तंभित झाले. 

दीड हजार वर्षांपेक्षा जास्त आधी आपल्या पूर्वजांनी हे लिहून ठेवलय.
या बिंदूपासून थेट दहा हजार किलोमीटर बाणाच्या दिशेने सरळ गेला तर दक्षिण ध्रुव लागेल आणि मध्ये जमिनीचा एकही तुकडा नाही हे आपल्या पूर्वजांनी कसे समजले असेल?
त्यांना पृथ्वीगोल आणि त्याचा दक्षिण ध्रुव अगदी नेमका कुठे आहे,हे अचूक माहिती होते आणि तसा  सरळ रेषा मार्ग देखील दर्शविला अगदी एक फुटाचा फरक न पडता....

 म्हणजेच त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा अभ्यास किती प्रगल्भ आणि अत्युच्च दर्जाचा होता हे लक्षात येतं.
 भूतकाळावर वर्तमानाने अभिमान बाळगत भविष्याला ते ताठ मानेने सांगावं असा तो क्षण होता.

 समृद्धीशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा बाळगणारे, मिरवणारे आपण सगळे खरोखर भाग्यवंतच!

त्या मंदिराचे वैभव पाहत असताना मनात विचार आला, आजवर गेल्या अनेक सहस्त्रकांमध्ये उझबेकिस्तान व अफगाणिस्तानातील आक्रंद मोहम्मद गजनी पासून ते क्रुरकर्मा औरंगजेब बादशाह पर्यंत जवळपास  सोळा ते सतरा वेळा या मंदिराला लुटलं गेल....
जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला, सोने नाणे जडजवाहार लुटले..अमानुष आणि भयंकर कत्तली केल्या........असे असून या यवनांना या मंदिराचे वैभव कमी करता आलं नाही की सामान्य भक्तांच्या हृदयातील श्रद्धा देखील कमी करता आली नाही........

इतके वेळा लुटून आक्रमण करून आजही त्याच जागी या मंदिराचे वैभव गर्वाने उभे आहे आणि श्रद्धेने असंख्य हिंदू बांधव येथे नतमस्तक होतात....... 
पण ज्यांनी लुटून नेले त्यांच्या पिढ्या आता काय करतात? .... 
उझबेगिस्तान असो की अफगाणिस्तान या देशांची आजची अवस्था काय आहे ? 

नित्सिम श्रद्धा व अतूट भक्ती यांच्या पायावर उभ्या राहिलेल्या भारतीय संस्कृती तिचा आपण एक भाग असल्याचा सार्थ अभिमान बाळगत परिसर पाहू लागलो.

 तो विस्तीर्ण असा समुद्रकिनारा नजरेत साठवत,  सोरटी सोमनाथ शिवाला मनोमन वंदन करत आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना आणि मंदिरांना भेटी दिल्या .

ज्यात भालका मंदिर, त्रिवेणी संगम, सूर्य मंदिर ,पांडव गुफा, कृष्ण देहोत्सर्ग ठिकाण यांचा समावेश होता. 
विशेष भाग्याची गोष्ट म्हणजे पांडव गुफेच्या शेजारी विस्तीर्ण मैदानात आम्ही गेलो तेव्हा  भागवत सप्ताह सुरू होता आणि त्या दिवशी आंतरराष्ट्रीय कथाकार पद्मश्री परमपूज्य रमेश भाई ओझा यांची द्वारकाधीश कथा सुरू होती.
 या सर्व दर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भजनांची सुरेख साथ आम्हाला लाभत होती. 
त्या भक्तीमय वातावरणात भारावलेल्या मनस्थितीतच दुपारचं जेवण करून आम्ही परत निघालो.

प्लास्टिक मुक्त परिसर व खड्डे मुक्त रस्ते... दुतर्फा  भर उन्हाळ्यात देखील हिरवीगार शेती.....मन प्रसन्न करत होती
 
साधारण तीन सव्वा तीन झाले असतील. अचानक आभाळ भरून आलं....आणि
सोसाट्याचा वारा सुटला. 
मुसळधार पाऊस कोसळू लागला. 
समोरचं काहीच दिसेना.
 गाडीचे वायपर सुद्धा थकले.
 तुफान पाऊस बरसला. या वाक्यातील तुफान या शब्दाचा आम्ही शब्दशः अनुभव घेत होतो...प्रवासात भारत पाक युद्धांच्या बातम्या आणि त्यावर मतमतांतरे  सुरू होती..
 अर्ध्या एक तासाने पाऊस थांबला. संध्याकाळी साडेपाच वाजता गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो.
  
नियोजनाप्रमाणे आज सोमनाथ दर्शन खूप चांगलं झालं म्हणून आम्ही खुश होतो. 
आता उद्या सकाळचे गिरनार दर्शनाचे नियोजन सुरू झाले.
उद्या सकाळी 7 वाजता रोप वे ( उडन खटोला ) पहिलाच स्लॉट ऑनलाईन बुकिंग आधीच करून ठेवले होते.

 सकाळी लवकर जाण्याचा फायदा हाच की जास्त उन्हाचा त्रास होण्याआधी दर्शन घेऊन खाली उतरता येईल. कारण उन्हाचा वैशाख वनगा पेटला होता, त्या उन्हाचा त्रास होण्याची शक्यता होती.

दर्शन करून लगेच परतीचा प्रवास करावा म्हणून ठाण्याला येण्यासाठी परतीचे दुपारी तीन वाजता स्लीपर कोच ट्रॅव्हल बस चे बुकिंग पण लगेच तिथल्या तिथे करून टाकले....

हुश्श...उद्याचे सारे नियोजन व्यवस्थित पार पडले होते.

आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या मनाला येईल तसं नियोजन करून ठेवलं,
 पण शेवटी म्हणतात ना त्याचा एक टक्का सोबत लागतोच याची प्रचिती पुढच्या एक तासात आम्हाला येऊ घातली होती....

पुढच्या एका तासात  आमच्या सगळ्या नियोजनाला एक वेगळंच वळण मिळणार होतं....


हॉटेल वरून फ्रेश होऊन आम्ही खाली उतरलो. 
रात्री शेजारच्याच गोरक्षनाथ आश्रमात  प्रसादाचे जेवण करायच असं ठरलं. 
त्या जेवणाला काही तास होते त्या मुळे तेवढा वेळ गिरनार पायथा परिसर फिरण्यासाठी निघालो.....

रस्त्यावर अगदी तुरळक वर्दळ होती,एखाद दुसरे माणूस नजरेत पडत होते,
गर्दी नसल्याचे कुतूहल वाटत होते.

उद्या सकाळी ज्या रोप वे ने जायचे आहे, त्याचा रस्ता,
 ते ठिकाण जावून आधी पाहून घेऊ या विचाराने.....
रस्त्यावर एकाकडे रोपवे कडे कसे जायचे ? या बद्दल विचारणा केली.

त्यावर त्याने उत्तर दिले, 

"यहांसे पास में ही है,  लेकीन वहां जाकर क्या करोगे? रोप वे तो 4/5 दिनोंसे बंद है|"

"चार दिवसापासून रोप वे बंद....कसे शक्य आहे"?

....परवाच तर आम्ही ऑनलाईन स्लॉट बुक केला होता....
हा माणसाला काही माहिती नसावे किंवा मस्करी करत असावा असे वाटून चालत चालत आम्ही रोप वे च्या गेट समोर पोहचलो पण......
सगळीकडे सामसुम ...
ती शांतता असह्य करत होती......
गेट बंद होते...
काहीच वर्दळ दिसत नव्हती......
एक क्षणात आमचं सगळं अवसानच गळून गेलं..

नाही म्हणायला एका बाजूला एक सुरक्षारक्षक दिसला. 
आही काही विचारण्याआधीच तो म्हणाला,

"मॅडम जी चार दिनोसे मौसम खराब होने के कारण  रोप वे बंद है |"

आम्ही एकदम गोंधळून गेलो...

"अरे भाई ,चार दिनोसे बंद था तो परसो हमे ऑनलाइन बुकिंग क्यू दिया?
 वहां पर यदि ये सूचना या चेतावनी मिल जाती तो हम बुकिंग नहीं करते |"

खर तर याचे उत्तर देण्यासाठी तो योग्य जबाबदार माणूस नव्हता हे माहिती असूनही आमचा त्रागा बाहेर पडत होता.

"मॅडम जी ऑनलाईन बुकिंग का कोई इश्यू नहीं है,आपके पैसे रिफंड हो जायेंगे |" 

अगदी खात्रीच्या सुरात त्याने उत्तर दिले.

"भाई सवाल पैसे रिफंड का नही है| हम ठाणे - मुंबई से केवल दर्शनमात्र हेतुसे गिरनार आये हैं |
यदि ये पूर्वसूचना हमे परसो ही मिल जाती तो हम ऑनलाइन बुकिंग करते ही नहीं और आज आते ही नहीं "

"  मैं आपकी भावना समझ सकता हूं,लेकिन यहां हररोज सुबह 6 बजे इंजीनियर रोपवे ट्रॉली टेस्टिंग करते हैं ,यदि वह टेस्टिंग में ओके ग्रीन सिग्नल देते हैं तभी उस दिन रोप वे शुरू करते है |"
आप इतनी दूर से दर्शन की आस लेकर आए है, मन से दत्तमहाराज की प्राथना कीजिए। क्या पता कल टेस्टिंग में ग्रीन सिग्नल मिल भी सकता है |"
"नहीं तो आप दस हजार सीढ़ी चढ़कर भी दर्शन कर सकते है | लेकिन इसमें खराब मौसम की चुनौति सबसे ज्यादा तकलीफ देती है |"

तो नक्की धीर देत होता की घाबरवत होता हेच समजत नव्हते.

पण त्याचे एक वाक्य कानात गुंजत राहिले," दत्तमहाराज की प्रार्थना करो, क्या पता कल टेस्टिंग में ग्रीन सिग्नल मिल भी सकता हैं ।"

माझी अगतिकता मी थांबवू शकत नव्हते.
 का कुणास ठाऊक..
नकळत डोळे पाणावले....
समोर दिसणारा गिरनार पर्वत अंबाजी माता मंदिर आणि त्याच्याही पलीकडे असणारं गुरुशिखर.. पायथ्यापासून आम्हाला खुणावत होतं.

 आणि आमच्या मनातील आशा पल्लवीत करण्यासाठी  त्याच्या मुखातून जणू दत्तगुरु आम्हाला मार्गदर्शन करत होते.

माझ्या मुलीने म्हणजे वीणा ने मोबाईल वर उद्याचे हवामान अंदाज पाहिले...,

" आई उद्या पण रोप वे सुरू होणे कठीण आहे ग ,कारण उद्या सुद्धा दुपारी 1 पासून विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे"

एकावर एक धक्के आम्हाला मिळत होते,
आणि इथे आज गर्दी का नाही याचा उलगडा झाला होता.

10 हजार पायऱ्या तेही इतक्या प्रतिकूल हवामानात चढ उतार करणे ही कल्पना पण करवत नव्हती....
आमची शारीरिक आणि मानसिक तयारीच नव्हती....
साध सरळ चालायचा सवय सराव  राहिला नव्हता तर पर्वत..पायऱ्या....विचारानेच पाय आणि मन जड झाले होते...

आमची मनस्थिती आमच्या लेकीने ओळखली....वीणा म्हणाली," असू दे जे असेल ते असेल."
"आपण पायरी मार्ग कुठे तो ही पाहून घेऊ...मी आहे न सोबत...जाऊ या आपण शिखरावर " 

असे म्हणून तिने एकाला पायरी मार्ग रस्ता विचारला आणि तिच्या मागे आम्ही ही 5 मिनिटात पायरी मार्गाजवळ आलो.

पहिल्या पायरीला नमस्कार केला. डाव्या हाताला मारूतीराया उभा आहे.
 त्याला साकडं घातलं. पहिल्या पायरीपासून वरील अकरा पायऱ्यांवर कर्पूर पूजा केली. थोड्या वरच्या बाजूला असलेल्या महादेवाचे दर्शन घेतलं.आणि तिथेच आम्ही तिघेही शांत बसून राहिलो,खूप वेळ कुणीही पायरीवरून वर जाताना दिसलं नाही की कुणी उतरताना भेटलं नाही.

 एव्हाना संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते,अंधारून आले होते...
आणि  अंधारात पायऱ्यांवर दोन आकृत्या दिसल्या.....
चला कुणाला तरी वर काय परिस्थिती आहे हे विचारता येईल याचा आनंद झाला....
ते दोघे मराठी तरुण होते आणि नियमित गिरनार ला येणारे होते......
खूप दमलेले होते.....
पहाटे वर चढायला सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळी 7 च्या सुमारास उतरत होते.

 "ताई वादळ पावसाने खूप परीक्षा पाहिली आमची, खूप वेळ थांबावे लागले, 
"तीन वेळा पूर्ण भिजून अंगावरच कपडे सुकले आमचे पण आधी अनुभव होता म्हणून पोहचू शकलो ,
आजवर इतका कठीण अनुभव आला नव्हता..."

 ते थकून हळूहळू पायऱ्या उतरणारे  तरुण पाहिल्यावर पुन्हा शंका आणि कुशंका यांचे थैमान मनात सुरू झालं या तरुणांची ही अवस्था आहे तर 
माझं काय होईल? 

  पाच हजार पायऱ्यावर अंबाजी मातेच्या मंदिरानंतर थांबण्यासाठी काहीच आधार नाही. 
काळा अभेद्य कातळ कडा..त्यातील अरुंद पायऱ्या
चालायचं, चढायचे, उतरायचं, पुन्हा चढायचं....खडी चढाई

 जमेल आपल्याला ??
 कसं होईल ? 
काय होईल....?

 या विचारात असताना ...
 आणखी चार पाच महिला उतरताना भेटल्या. 
लातूरच्या होत्या. 

"काय मावशी झालं का दर्शन?"

"नाय वो ताई"

 "का हो?"

 "काय सांगू ताई,जीवाचं रान करून आठ हजार पायऱ्या चढलो. 
दोन तीनदा मुसळधार पावसात  ओल्ली झालो आणि सुकलो बी पण दोन हजार पायऱ्या शिल्लक असताना माघारी फिरायला लागलं
 सोसाट्याचं वारं ,वेड्यावाणी पाऊस आणि ढग इतक उतरलं की दोन हात जवळ असलेलं माणूस दिसना....पुढ जाताच येत नव्हतं..आणि थांबाया येळच नव्हता कारण आम्ही  ट्रॅव्हल्स बस ने आलोय..बाकी कुणी वर आलच नाही सगळ्यांनी पायरीवरूनच दर्शन घेतलं फक्त आम्ही चौघीच वर आलो होतो...
आता रात्री 8 ला बस निघणार आहे... आमच्यासाठी थोडीच थांबणार व्हती...म्हणून तिथूनच नमस्कार करून माघारी फिरलो गं."

 हे सांगताना त्यांचा रडवेला चेहरा माझ्या नजरेतून सुटला नाही.

आठ हजार पायऱ्या चढून दर्शन न घेता त्या मागे आलेल्या होत्या. 

किती वाईट वाटलं असेल !

 मनात म्हटलं" दत्त महाराज किती ती परीक्षा पाहायची?"

त्यामुळे मला माझ्या क्षमतेवर पडणारे प्रश्न अधिक गडद झाले..?
आपली ही अवस्था ह्या पेक्षा निराळी नसणार आहे,...
इथे येऊन शिखरावर न पोहचताच परत जायचे....
मनाची घालमेल वाढत होती..
उसन आलेलं अवसान गळून पडत होत...

थोड्या वेळात आणखी दोन महिला खाली उतरताना दिसल्या,
आई आणि मुलीची जोडी होती ती.
त्या ही दमल्या होत्या,
यांचाही अनुभव वेगळा नसणार होता हे माहिती असूनही त्यांना थांबवलं...आणि चौकशी सुरू केली.

"ताई कसे झाले दर्शन ." _ माझे कुतूहल

"खडतर होते पण पोहचलो आम्ही आणि झाले दर्शन आम्हाला..."
"तोच नेतो आपल्याला".  त्यांच्या अनपेक्षित उत्तराने मला आनंद झाला.

दोघी मायलेकी पुण्याच्या होत्या. 
 आई जवळपास माझ्याच वयाची.
त्याही सकाळी सातला  रोप वे बंद होता म्हणून वर चढल्या होत्या आणि आता संध्याकाळी साडेसात वाजता  खाली उतरत होत्या.
वादळ , वारा पाऊस ढग या साऱ्यांचा त्यांनीही सामना केला होता.. एकमेकींचा हात धरून पाऊस वादळ कमी होण्याची वाट बघत एका जागी अर्धा पाऊण तास बसून मग हळूहळू पुढे जात राहिल्या होत्या.त्या ही अंगावरच तीन ते चार वेळा चिंब भिजून तशाच वाळल्या सुद्धा होत्या.... 
अत्यंत खडतर प्रतिकूल परिस्थितीत दर्शनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.....
त्या मुळे थकवा असूनदेखील जाणवत नव्हता.....
त्यांनी आम्हाला धीर दिला 
काही काळजी करू नका सगळा भार दत्त महाराजांवर सोडा... 
"तुम्ही तर एकमेकांना तिघे सोबत आहात ,जावू शकाल तुम्ही अवघड आहे पण अशक्य नाही."

त्यांच्याशी बोलल्यानंतर मनानं पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात केली. 
ठीक आहे सवय नसली म्हणून काय झालं प्रयत्न तर करून बघूया, या निर्णयाप्रत यायला लागले.

त्या दोघींचं आमच्या पायाकडे लक्ष गेलं .
आमच्या पायातील स्पोर्ट्स शूज कडे पाहून त्या म्हणाल्या,

"हे बूट उद्या चढताना चालणार नाहीत कारण पाऊस असणारच आहे बूट भिजले की अजिबात चालता येणार नाही आणि पायाला प्रचंड त्रास होईल. "
"तुम्ही पावसाळी साधी चप्पल किंवा स्लीपर वापरा..."

 आम्ही  केलेली जय्यत तयारी किती कुचकामी आहे हे आमच्या लक्षात आलं होतं...
कारण आम्ही सोबत सध्या चप्पल स्लीपर आणल्या नव्हत्या.
लागलीच आम्ही पायथ्याशीच असलेल्या एका दुकानातून कशाबश्या तिघांसाठी प्लास्टिकच्या चपला विकत घेतल्या.  
कारण तिथे खास चप्पल बुटाच दुकान नव्हते..एक कटलरी समान दुकानातून ज्या आणि जशा मिळाल्या तश्या चप्पल घ्याव्या लागल्या...
आता या नवीन चपला पायाला चावतील म्हणून  दहा-बारा बँडेज च्या पट्ट्या घेतल्या. 
मध्ये थकायला झालं तर म्हणून ग्लुकोज ची पावडर घेतली. पाण्याची बाटली घेतली.
उद्याच्या चढाईची अशी एकंदरीत तयारी झाल्यानंतर आम्ही गोरक्षनाथ आश्रमात प्रसादाचे सात्विक जेवण करून रूमवर परतलो.

 मनात अखंड विचार. 
 चमत्कार झाल्यासारखा रोपवे चालू होईल का?
आपल्याला दहा हजार पायऱ्या चढता येतील का? 
बरं चढल्यानंतर त्या उतरता येतील का?
फजिती तर नाही होणार ना?

 उद्या भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळंच बंद झालं तर ?
ही शक्यता होतीच.

ह्या विचारात असताना अचानक काहीतरी आठवल्यासारखे झाले.....


एक  म्हणजे आमच्या रूमच्या खिडकीतून रोपवे अगदी स्पष्ट दिसत असतानाही सकाळी जेव्हा आम्ही रूमवर आलो.... तेव्हा तो बंद आहे हे कसे लक्षात आले नाही? 
.
किंवा खाली उतरल्यावर कुणाला रोपवे बद्दल विचारावे असे का वाटले नाही ?
कारण
दत्तगुरूंनी आम्ही सोमनाथ दर्शन अगदी निश्चिंत मनाने करावे ,
कोणतेही चिंता सोबत बाळगू नये,
 आमचा मूड दिवसभर आनंदी रहावा याची खबरदारी घेतली असावी.

आणि महत्वाची दुसरी गोष्ट आठवली ती म्हणजे ,
अवघ्या काही तासांपूर्वी आपण उद्या दुपारी तीनच्या बसचं रिझर्वेशन केल आहे.
आता रोप वे बंद आहे म्हणजे संपूर्ण 10 हजार पायऱ्या चालत जाव्या लागणार म्हणजे आम्ही संध्याकाळ शिवाय खाली उतरू शकणार नाही , 
मग दुपारी तीन वाजता ची गाडी मिळू शकणार नाही.

 आता पैसे वाया जाऊ नयेत म्हणून ते रिझर्वेशन एक दिवस पुढे ढकलायला हवं होतं.

आता रात्रीचे 9 वाजून गेले होते 
खर तर संध्याकाळीच ट्रॅव्हल कंपनीला फोन करायला हवा होता, 
पण मागच्या दोन-तीन तासात आम्हाला काही सुचतच नव्हतं.
तरीही आम्ही रिझर्वेशन पुढे ढकलण्यासंबंधी कॉल करण्याचा प्रयत्न केला.
पण उशीर झाला असल्याने कॉल अटेंड झाला नाही,
शेवटी म्हटलं मेसेज ड्रॉप करून ठेवूया..

 त्यांनी री शेड्युल केलं तर ठीक  नाहीतर सोडून देऊ ,
पैसे वाया गेले असे समजूया.
असा विचार करून 
दुपारचे तीन चे रिझर्वेशन रद्द करून दुसऱ्या दिवशी तीन वाजता करण्यासाठी विनंती मेसेज आम्ही ट्रॅव्हल ऑपरेटर ला करून आम्ही दत्त महाराजांना प्रार्थना करून बिछान्यावर पडलो....

मनात विचार हेच..
काहीही झालं तरी उद्या गिरनार शिखर चढायचेच ... हवामान कसेही असो..
कितीही त्रास होवो...
अहो...
 वैराग्याचं प्रतीक असणारा तो ...
कदाचित सांसारिक आसक्ती पासून आम्ही किती विरक्त होतोय याचीच परीक्षा पाहत असावा.

 मनात म्हणत असावा, 
मला भेटणं एवढं सोपं नाही.
सुखाचा मोहाचा त्याग हीच माझ्या भक्तीची पहिली पायरी आहे.

विरक्तीचा हा नाथपंथीय नियम दत्तगुरु आम्हाला कदाचित अशा पद्धतीने समजावून सांगत होते.

  बऱ्याच प्रयत्नानंतर खूप उशिरा कधीतरी डोळा लागला. 
पहाटे साडेचारलाच जाग आली. 
आणि खिडकीतून रोपवे कडे पाहण्याचा माझा चाळा सुरू झाला.
त्या वॉचमनच्या म्हणण्यानुसार रोज सकाळी सहा वाजता टेस्टिंग घेतली जाते
सुरुवातीला काळोख असल्यामुळे काहीच दिसत नव्हत.
सव्वा सहाला मात्र तिथे रोप वे ट्रॉली ची हालचाल दिसू लागली. 

दत्त महाराजांचा धावा करत..सारे ठीक असू दे....ग्रीन सिग्नल मिळू दे हा धावा करत उत्साही मनाने आमच्या हालचालींना वेग आला.

 अतिशय उत्सुकतेने जणू काही दत्तगुरुंनी आमचं ऐकले की नाही याची परीक्षा घेण्यासाठी पावणे सात वाजता आम्ही रोपवे प्रवेशद्वारावर हजर झालो होतो...

 खरोखरच  रोपवे सुरू झाला होता.
आम्हीच पाहिले गेलो होतो,
 आमची तिकीटं पहात, सोबत जर प्लास्टिक असेल तर ते काढून घेत आम्ही  पुढे जाऊ लागलो.
सर्व पायऱ्या चालत जाव्या लागतील या 12 ते 14 तासाच्या प्रवासासाठी म्हणून भरलेली बॅग ..चांगलीच जड होती....

रोपेच्या ट्रॉलीत बसल्यानंतर झालेलं समाधान आणि दत्तगुरू बद्दलची कृतज्ञता आता मला शब्दात व्यक्त करता येणार नाही.

निघण्यापूर्वी  तेथील प्रशासनाने आम्हाला सूचना दिल्या,
"रोपवे कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही बंद होऊ शकतो. 
"त्यामुळे रिटर्न तिकिटाचे पैसे परत दिले जाणार नाहीत."
 "पुढे पाच हजार पायऱ्यांवर गुरुशिखरावर महाराजांच्या पादुका आहेत ,मात्र तिथे जाण्यात वेळ घालवू नका...."
 "रोप वे ने उतरल्यानंतर जवळच अंबाजी मातेचे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन लगेच परत या कारण रोपवे बंद करावा लागला तर तुम्हाला चालत यावं लागेल."

"परतीच्या प्रवासाची खात्री आम्ही देऊ शकत नाही."

त्यांच्या सूचना फक्त कानापर्यंतच पोहोचत होत्या त्या मनापर्यंत गेल्याच नाहीत......

मन तर गुरुशिखरावर पोहचले होते....

  आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे अशी ख्याती असलेल्या रोपवे ट्रॉलीतून प्रवास सुरू झाला....

गिरच्या जंगलाचं सुखद दर्शन घेत ,मध्येच काळवीट, सांबर यांना पाहत, असंख्य मोरांचे दर्शन घेत, त्यांची केकावली ऐकत साडेसात वाजता आम्ही अंबाजी माताजी मंदिराजवळ उतरलो.

देवी पार्वतीने अंबेच्या रूपात  इथे निवास केला होता, अतिशय सुंदर असं मंदिर आहे इथे.
इथून आता 5 हजार पायऱ्यांची खडी चढाई सुरू होणार होती.

एक शिखर उतरून पुन्हा एक शिखर चढाई करून  गोरखनाथांच्या मंदिराजवळ पोहचलो .

गोरख नाथांच्या तपश्चर्येने पावन झालेलं हे या डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर..... 
उतरल्यापासून कुठेही न थांबता सलगपणे झपाझप पायऱ्या चढत उतरत आम्ही या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो... 
श्वास चांगलाच फुलला होता... आजूबाजूला खाली पाहिले तर काहीच दिसत नव्हते पांढऱ्या शुभ्र ढगांशिवाय..... 
अतिशय विहंगम असे दृश्य होते.... 
गोरक्षनाथांना नमस्कार केला... समोर गुरुशिखर दिसत होते... 
आम्ही उभे होतो या शिखरापेक्षा गुरु शिखराची उंची थोडी कमी आहे.... त्याची एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते.... सरळसोट कातळ सुळकावर गुरुशिखर दिसत होते परंतु तिथे जायला पायऱ्या मात्र नजरेत पडत नव्हत्या. 
त्या शिखरापासून काही शे पायऱ्या सरळसोट खाली उतरलो आणि नंतर मग गुरुशिखरावर जायच्या पायऱ्या नजरेस दिसू लागल्या..... 
खालच्या टप्प्यावर श्री गुरुदत्तात्रेय पादुका दर्शन नावाची कमान दिसली.... 
आणि आपण आता आपल्या ध्येयाच्या अगदी समीप आलो याचा आनंद झाला... 
बाजूलाच कमांडलू तीर्थ... 
परंतु गुरुशिखराचे दर्शन घेऊन पुन्हा खाली इथे येऊन प्रसाद घेण्याचा रिवाज असल्याने कमांडलो तीर्थयाकडे न वळता आम्ही सलग गुरु शिखराच्या खड्या पायऱ्या चढायला सुरुवात केली...... 
खूप दमछाक होत होती परंतु विश्रांतीसाठी थांबायला मन तयार नव्हतं.... 
हवामानाचा काहीही भरोसा देता येत नव्हता, काल संध्याकाळी आठ हजार पायऱ्या वरून परत फिरणाऱ्या महिला भक्तांचे चेहरे डोळ्यासमोर आले, आणि श्वास फुलला तरी न थांबता हळूहळू का होईना एक एक पायरी पुढे चढत गुरुशिखराच्या माथ्याजवळ अगदी समीप आलो.... 
अगदी तुरळक लोक मागेपुढे होते, म्हणजे दर्शन अगदी निवांत घेता येणार होत... 
आमची वीणा गुरुशिखरावर पोहोचली देखील होती,

"आई बाबा लवकर या , अगदी थोडं राहिले आहे, "

गार वाऱ्यासोबत तिने मारलेली हाक अंग शहरून गेली...
 पायात बळ एकवटलं.... 
खोल श्वास भरून घेतला आणि न थांबता एक एक पायरी पुढे जात.... 
गुरुशिखरावर पोहोचलो...... मंदिरात पोहोचतच... 
संपूर्ण शरणागत भावाने कितीतरी वेळ पादुकांसमोर बसून राहिले... 
डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते.... याच साठी केला होता अट्टहास.......... थोड्या वेळाने भानावर आले... दत्तगुरुंना अर्पण करण्यासाठी म्हणून खास आमच्या घरचे आंबे आणले होते, ते अर्पण केले.... प्रदक्षिणा घालून  बाहेर पडले.... श्री गुरुदत्तात्रेयांच्या तपश्चर्येच्या अलौकिक तरंग लहरी आपल्या आपल्याला नक्की जाणवतात......थोडा वेळ विश्रांती घेऊन हळूहळू खाली उतरायचा प्रवास सुरू केला.

इथे नक्की एक अनुभव सर्वांना आला असेल किंवा तुम्ही नक्की घ्याल, ..जेव्हा डोळे मिटून पादुकांसमोर नतमस्तक होतो  तेव्हा मन निर्विकार होते, 
तुम्ही काहीही ठरवलं असेल तरी काहीही मागण्या काहीही याचना , प्रार्थना मनात येत नाहीत.... 

श्रीपाद वल्लभ श्री दत्तगुरु अनंत कोटी ब्रम्हांडनायक जरी असले, तरीही ते योगी ,विरागी ,निर्मोही ,स्थितप्रज्ञ , वैराग्याचं प्रतीक असल्याने धनसंपदा, ऐश्वर्य, सुबत्ता  यापेक्षा  अध्यात्मिक मनशांती इथे लाभते, त्याचा अनुभव अन्यत्र कुठे येणे शक्य नाही......
खाली उतरताना नंतर घड्याळ पाहिले ,
वेळ पहिली आणि आश्चर्याला आणि आनंदाला पारावर राहिला नाही.... 
कारण सकाळी साडेआठ वाजता दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली होती.....

काल रात्रीची माझी मनोवस्था..... 
दर्शन होणार की नाही ही साशंकता...
12 तास की 16 तास चालावे लागेल हा हिशोब ......
आणि आज मात्र सकाळी 7 वाजता निघून 8.30 दर्शन घेऊन उतरायला सुरुवात.......
"काय आणि कसे स्पष्टीकरण करणार आपण!"
 
तीनशे पायऱ्या खाली उतरल्यानंतर कमंडलू तीर्थ वर जाऊन दर्शन घेतले...
दर सोमवारी तिथे स्वयंभू धुनी प्रज्वलित होत असते....
तिथे अव्ययतपणे महाप्रसाद सुरू असतो
 प्रसाद म्हणजे गरमागरम जेवण!
 पोळी, भाजी, वरण भात, गोडाचा पदार्थ ......
दहा हजार पायऱ्या चढून तुम्ही वर येता त्या कोणत्याही वेळी ही महाप्रसादाची सिद्धता तुमच्यासाठी तयार असते, "काय म्हणणार आपण याला....! मती गुंग होणे हाच अनुभव.

दत्तगुरूंच्या आशीर्वादाने इतक्या उंचीवर त्या कातळात गंगा अवतरी आहे.
हे अमृत कुंड  म्हणजे एक चमत्कारच म्हणायला हवा.
 इतक्या उंचीवर काळया कातळात मधुर जल भक्तांची तृष्णाच नव्हे तर तन मन शांत करत असते.
 भक्तीत किती शक्ती असते याची प्रचिती त्यावेळी मात्र नक्की आली.
 धुकं, वारं आणि ते तुषार अंगावर घेत अतिशय अल्हाददायक वातावरणात खाली उतरू लागलो... 
महिना मे, वैशाख वणवा रणरणत असताना ,आम्ही मात्र थंडगार ढगांच्या पुंजक्यातून खाली उतरत होतो.

एक मात्र खरं उतरताना गुडघ्यावर जास्त ताण येतो आणि पाय थरथरू लागतात...
 आम्ही उतरत असताना आता वर जाणारे भक्त भेटत होते..
कुणी रात्री निघाले होते कुणी रोप वे ने आले होते..... आम्ही सोबत घेतलेल्या लिमलेटच्या गोळ्या ,चॉकलेट , खाऊ आणि पोलो गोळ्या.....आमची वीणा अगदी आवडीने जाणाऱ्यांना देत होती...
आणि "थोडेच राहिले आहे....."
"लवकरच पोहचाल "
म्हणत त्यांचा उत्साह वाढवत होती.......
 उतरता उतरता 8 हजार पायरी टप्पा आला....
आणि काल इथले वातावरण कसे असेल याची कल्पना आली....
अनेक बूट ,भिजलेल्या बॅगा लोकांनी कालच्या वादळात तिथेच सोडलेल्या दिसल्या....

"खरच त्याने बोलल्याशिवाय तुम्ही तिथे पोहचत नाही हेच खरे."

गोळ्या ,खाऊ वाटून आता आमची बॅग बर्यापैकी रिकामी झाली होती पण मन भक्तिभावाने ओतप्रोत ओसंडून वाहत होते.
त्याच आनंद लहरींवर स्वार होत....आम्ही जिथून चढायला सुरुवात केली त्या अंबाजी मंदिराजवळ आलो, दर्शन घेतले...
गिरनारच्या तिन्ही शिखरांचे पुनश्च एकदा मनोभावे दर्शन घेतले.....आणि उतरण्यासाठी रोप वे मध्ये आलो....

निघताना रोपवे प्रशासनानं दिलेल्या सूचना निदान आमच्यासाठी तरी वाऱ्यावर विरून गेल्या होत्या.....
कारण रोप वे सुरूच होता...
आम्हाला सुखरूप आणि आरामात खाली परत नेण्यासाठी....
 सव्वा दहा वाजता आम्ही खाली पायथ्याजवळ उतरलो.....
तसेच लगोलग..काल संध्याकाळी ज्या पायरी मार्गावर कर्पूरपूजन केले तिथे गेलो, 
त्यात पहिल्या पायरीला वंदन केले, मारुतीरायाला नमस्कार करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली....

तेवढ्याच ट्रॅव्हल्सचा फोन आला ...

कारण शिखरावर नेटवर्क नव्हतं , आणि त्याबद्दल आम्ही पूर्ण विसरून गेलो होतो.

 ट्रॅव्हल ऑपरेटर आम्हाला सांगत होता,

" तुमची रिझर्वेशन पुढे ढकलण्याची विनंती आम्हाला मिळाली, 
परंतु माफ करा ,
तुमचं आजचं दुपारचं रिझर्वेशन आम्ही पुढे ढकलू शकत नाही."

मी आनंदात म्हणालो ," झाले ते चांगलेच झाले, रद्द केले नाही ते योग्यच झाले आम्ही आजच प्रवास करीत आहोत."

आणि पुन्हा गुरुदेव दत्तात्रय महाराजांना नमस्कार केला,म्हटले ,"किती काळजी घ्याल महाराज, काय तुमची लीला वर्णावी!

विचार केला ...समजा यांनी आपली विनंती मान्य करून रिझर्वेशन उद्यावर ढकलले असते तर......
कारण नसताना पूर्ण दीड दिवस हॉटेल वर थांबायला लागले असते..वीणाचा क्लास चुकला असता.....

साडे दहा वाजता आम्ही आमच्या रूम वर परत आलो.....
विश्वास बसणे अवघड होते,सकाळी 7 वाजता निघालो काय आणि गुरुशिखर दर्शन महाप्रसाद घेऊन साडेदहा वाजता पुन्हा रूमवर परत येतो काय... सारे सारे जणू स्वप्नवत भासत होते.
खिडकीतून गिरनार शिखराकडे पाहिलं.... पाहता पाहता आभाळ भरून आलं...... वेधशाळेच्या अंदाजाच्या दोन तास आधीच वारा आणि पावसाला सुरुवात झाली.....आणि पुढच्या 15 मिनिटात रोप वे बंद झाला....

मी स्वतःलाच चिमटा काढून पाहिल ...
हे स्वप्न तर नाही.... 
अहो एक तरी अनुभवाची प्रचिती मिळावी याकरिता आलेल्या मला ,पावलापावला वर क्षणाक्षणाला त्याची साक्ष मिळाली होती.
म्हणजे दत्तगुरुंनी केवळ आमच्यासाठीच काही काळा पुरता तो रोपे सुरू केला होता की काय ? 
अशी शंका माझ्यासारख्या एखाद्या च्या मनात येणे किती स्वाभाविक आहे ना .

आदेश, आनंद, अनुभव आणि अनुभूती हे सगळं सोबत घेऊन दत्तगुरूंच्या आशीर्वादाने दुपारी 3 वाजता ट्रॅव्हल्सने आम्ही ठाण्यात सुखरूप पोहोचलो .

 घरी पोहोचल्यानंतर टीव्हीवर बातमी पाहिली की गुजरातच्या काही जिल्ह्यांवर पाकिस्तानने काही ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे..

 "देव आहे किंवा नाही ....कुणी पाहिले देवाला
 शेंदराच्या दगडाचा ....उभा आधार गावाला!"

 साहेबराव ठाणगे यांच्या ओळी सारख्या मनात येत होत्या. 

खरोखर या अनुभवातून मी तो देव पाहिला.

 शेवटी असे अनुभवच माणसाला समृद्ध करत असतात. 
एखाद्या श्रद्धेवरचा दृढ विश्वास आणखी निश्चल करत असतात .
दत्तगुरूंच्या मनात आलं आणि अडीच दिवसात आम्ही जाऊन सुखरूप परतही आलो.
 आता मनाची अवस्था आनंद पोटात माझ्या माईना अशी झाली आहे. म्हणून हा आनंद या लेख प्रपंचाच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहोत.

 गुरुदेव दत्त 
जय गिरनारी


योगेश जोशी 
साधना जोशी
वीणा जोशी

रंगवली कलाकार कु . आशि मकरंद भुरे ..@मस्कत

Friday, 21 October 2016

भारत कधी कधीच माझा देश आहे

माझी  लेखनयात्रा
.       *जीवन एक संघर्ष*

* *वाचा  विचार करा पण  थांबू  नका* *

सध्या  चर्चा  सूरू  आहे  ती  पाकिस्तानी सिनेकलावंताचा सहभाग  असलेल्या  चित्रपटाच्या प्रदर्शन विषयी ,

त्यासाठी  सरकारी संरक्षणाविषयी,

बघावा  की  बघू  नये  या विषयी.

बाॅलिवूडचा कळवळा  असणारे  व  स्वताला  ऊच्चविद्याविभूषित  म्हणवणारे  नतद्रष्ट  असे  म्हणतात   की  कला ही  कला असते  तिला  धर्म , प्रांत या बंधनात  अडकवता कामा नये.
दोन  देशातील  वैर खेळाडू  तसेच कलाकारांमध्ये कशाला ???
कलेशी ,कलाकारांशी  आपले  वैर कशाला. ....???  वैगरे .वैगरे

*हे सगळं ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते*

मग  दोन  देशांतील  वैर  नेमके  असत  कोणात  हो  ?

त्या सीमेवर  हाड  गोठवणार्या  थंडीत  कूडकूडणार्रा  सैनिकांमध्ये
असते की  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  दूर्गम भागात  छातीचा  कोट  करून  ऊभ्या असलेल्या  जवानांमध्ये  असते 
की  घरदार  मूलंबाळ,  संसार , लांब  सोडून  जीवावर उदार  होऊन  सीमेवर  डोळ्यात तेल  घालून  गस्त  घालत  पहारा  देणार्‍या  सैनिकांमध्ये असते का वैर ?

*त्या  पाकिस्तानी  सैनिकाबरोबर कशाला भारतीय  जवानाने   वैर  घ्यायचे ? त्यानी ऐकमेकांचे वैयक्तिक अस काय वाईट  केल  आहे ?

अरे अकलेच्या  खंदकांनो आमचा  सैनिक त्याच्या  रक्ताने माझ्या देशाच्या सीमा आखतो  म्हणूनच  तूमच्या सारखे कृतघ्न  कलाकार  उघडे नागडे नाचून कोट्यधीश होऊ शकतात ... बेताल  बोलू  शकतात.... 
ईथलेच खाऊन  ईथेच  गरळ  ओकू  शकतात ... .

पण बाॅलिवूड सम्राटांनो हा दोष  तूमचा नाही आम्हीच  षंढ  झालो  आहोत

आमची देशभक्ती फक्तं 15 ऑगस्ट ला तिरंग्याचा डीपी  आणि  ऊरी सारख्या  हल्यानंतर "भावपूर्ण  श्रध्दांजलि "अमर  रहे "किंवा  आंख   मे  भर  लो पानी या  रिंगटोन मर्यादेपूरती दिखावू बेगडी  असते  .

*कारण कधी कधीच भारत माझा देश  असतो*  .

👉पण आता  मात्र या वेळी  हा समज  खोटा  ठरवायचा  आहे

🇧🇴बांधवांनो ऊरीतील शहीदांचा बदला  तर  आपल्या  सैनिकांनी घेतला  आहे 

आता आपली म्हणजे  सामान्य  भारतीय🇧🇴  नागरिकाची  वेळ  आली आहे बदला घ्यायची

आपल्या कृतीतून दाखवून  देवू  आपल्या  सैनिकांना  तूम्ही  एकटेच  लढत  नाहीत तर  आम्हीही  आहोत  सोबतीला .🇧🇴

ईतका  कडक  बहीष्कार घालूया  यांच्या  चित्रपटावर  की  डोयरकीपर पण  म्हणायला  हवेत  की  नोकरी  गेली  तरी  चालेल  पण  मी सूद्धा चित्रपटगृहात आत  जाणार नाही
हीच  खर्या अर्थाने  ऊरीतील  हूतात्मा जवानांना सूजाण सूज्ञ  व  कर्तव्यदक्ष नागरीकांकडून खरी  श्रद्धांजली  ठरेल 💐

आणि  तरीही कोणी  जर  चित्रपट  पहायला गेला तर तो  **  *** ** ***  

संस्कार व पेशा या मूळे मला फूल्या फूल्या लिहायला भाग पडते आहे
  पण सूज्ञ वाचक  त्या अचूक  भरतील  ही खात्री

जय हिंद 🇧🇴
वंदे मातरम

योगेश जोशी
वज्रेश्वरी /ठाणे

*टिप* :कृपया जास्तीत जास्त  शेअर  करा.. नावाशिवाय   शेअर   केल  तरीही  चालेल देशभक्तीला काॅपीराइट  नाही
कोणी हिंदीत  अनूवाद केला  तरी चालेल  जास्तीत जास्त  जणांपर्यत शेअर  करा
आणि  हो कोणत्याही  गरीब  कलाकार  किंवा तंत्रज्ञ यांचे  पैसे या चित्रपटात  अडकलेले  नाहीत
  आता फक्त  आपल्या भारतीयांच्या जीवावर मोठे झालेल्या  चार  दोन गर्विष्ठ  धनाढ्यांचा नफा  अडकलेला  आहे

Saturday, 25 June 2016

तूम्ही कोण ??? कूंभार,शिल्पकार, की माळी

Iचिंतनिका जीवन एक " संघर्ष "

तूम्ही  कोण ?? कूंभार, शिल्पकार, की माळी  !!

  शैक्षणिक वर्ष सुरू  झाले  आणि  पून्हा  शाळा  शिक्षण  प्रक्रिया  हे  शब्द  ऐकू  येवू  लागले . शाळेत  जाऊन  शिकणे..  किंवा  शाळेत  शिकवले  जाणे .. वा  मी शिकवतो. ...अस  ऐकल  की  शिक्षण  , शिकणे,  शिकवणे ही नक्की  काय  प्रक्रिया  आहे ? हे  कोड  पडत.
मूल  शिकत  कस  ?
त्याला  शिकवलं  जात  म्हणजे  नेमक  काय  ?
हे प्रश्न  ऊभे ठाकतात.

एक सर्वमूखी असलेली  समजूत  म्हणजे  " लहान  मूल  म्हणजे  ओला  मातीचा  गोळा  , जसा आकार  द्याल  तसे  घडेल. "
  या ठीकाणी  शिक्षक /पालक  हा कूंभाराच्या भूमिकेत  दिसतो .

तर  शिक्षक  हा  शिल्पकार  असतो असही  म्हटल  जात.  दगडात  मूर्ती  असतेच  शिल्पकार  फक्तं  त्याला  नको  असलेला  भाग  छिन्नीने काढून  टाकतो व  हवे  असलेले  शिल्प  बाहेर  येते.

असे निरनिराळे  सिध्दांत  ऐकले  की  गोंधळ  होतो  समाधान  होत  नाही.

खरच  शिक्षक /पालक हा   कूंभार  किंवा  शिल्पकार  असू  शकतो.  नक्कीच  तस  नसावं.  कारण  चैतन्याने  भरलेले  मूल  म्हणजे  एकसारखी  माती वा निर्जीव  पाषाण  थोडेच  आहेत  ???
तस  असत  तर  कूंभार / शिल्पकाराप्रमाणे आपल्याला  हवी  तशी  साचेबद्ध  मूल  घडवू शकलो  असतो आणि तशी घडलीही असती .

क्रिडागूरू रमाकांत  आचरेकरांनी सचिन तेंडुलकर  सारखी  अनेक शिल्प  /मडकी  तयार  केली  असती .
याप्रमाणे  अनेक  अब्दुल  कलाम , अनेक  लता,अनेक  न्यूटन  ,अनेक  होमी भाभा    अशी  फक्तं  आणि  फक्तं  हिमालयाची  अनेक शिखरचं तयार  करता आली असती.

कोणतेही  पोषक  वातावरण ,  क्रिडा पाश्वभूमी  नसतानाही " सूनिल " विक्रमादित्य  सूनिल  गावस्कर  होतो  परंतू  जन्मापासून  सर्व  पंचतारांकित  सोयी  ,सूविधा ,कोचिंग,  मार्गदर्शन  ऊपलब्ध  असतानाही  "रोहन " त्या  क्षेत्रात " रोहन  गावसकर  " बनू  शकला  नाही.
आणि मग शिकणं- शिकवणं म्हणजे  नक्की काय  हे  समजून  घेण्याची  ऊत्सूकता  वाढते .

अशावेळी  वीस  वर्षापूर्वीचा एक  प्रसंग  आठवला. आमच्या  वज्रेश्वरी  गावातील  मारूती  मंदिरात   एक  ऐंशी -पंच्याऐंशी वर्षाचे  ऋषितुल्य  संन्यासी  व्यक्तीमत्व  रहात होते. मराठी, इंग्रजी व संस्कृत  वर  ऊत्तम  प्रभुत्व असलेले व वेदशास्त्र पारंगत आणि  दिव्य  स्मरणशक्ती  असलेले  पूरूष,  वेदमूर्ती विठ्ठलपंत  कूलकर्णी  (बाबा ) या नावाने सर्वाना  गूरूस्थानी होते.
मंदिरात त्यांनी मला  विचारले "योगेश काय  चाललय  सध्या  ?"
"शिक्षक  म्हणुन  रूजू  झालोय. .मूलांना  शिकतोय. ..मी ऊत्तरलो
पांढर्या  शूभ्र  लांब  दाढीवरून हात  फिरवत  हसत  हसत  बाबा  म्हणाले  ,  "तू  शिकवत  नाही  रे  त्यांना  , फक्तं  शिकायला  मदत  करतोस. "
माझ्या  कपाळावरील  प्रश्नचिन्ह  पाहून  बाबांनी  मला ऊदाहरणादाखल" शांतिमंत्र " अर्थासहित  स्पष्ट  केला.
यजुर्वेदाच्या शेवटचा अध्याय महत्वाचे  उपनिषद
" ईशावास्योपनिषधाचा " आहे . या  उपनिषेदाचा प्रारंभ  व  शेवट  याच  शांतिमंत्राने  झाली  आहे.

.           ॐ पूर्णमदः पूर्ण मिदं
              पूर्णात पूर्णमुदच्यते ।
               पूर्णस्य  पूर्णमादाय
               पूर्णवेवावशिष्यते ।
        ॐ शांति : शांति  :शांति : ॐ

                      याचा  अर्थ 
        ब्रह्म  पूर्ण  आहे , ते  पूर्ण  आहे
     हे  पूर्ण  आहे , पूर्णातून पूर्ण  निष्पन्न  होते,
    पूर्णातून पूर्ण  काढून  घेतले  वजा  केले  तरी 
               पूर्णच  बाकी  राहते.

या  विश्वातील ,  ब्रह्मांडातील  प्रत्येक  जीव  जंतू  पूर्ण  आहे. किती मोठा व  गहन  अर्थ  सांगितला  आहे  यात.

अहो  एखाद  लहानसं  " बी  " च  उदाहरण  घ्या.     
' बी"लहानसं जरी असल तरी ते अपूर्ण असतं का हो?   
नक्कीच नाही.... 
तर त्यात संपूर्ण झाडाचे गूण संपृक्तपणे ठासून भरलेले  असतात. एवढ्याशा " बी " मध्ये संपूर्ण मोठे झाड  लपलेले असते.  फक्‍त ते झाडाचे सारे गूण प्रकट  होण्यासाठी कुशल माळी किंवा शेतकरी मदत करत असतो  ईतकचं !

कवी  विल्यम्स  वर्डसवर्थ म्हणतो  "Child  is  father  of  man  ."

लहान  अर्भकातच संपूर्ण  माणूस दडलेला  असतो .आणि  ईथे  आम्हा  आईबापाला  अहंकार होतो 'आम्ही  मूलाला  वाढवले  शिक्षकांना  वाटत ' आम्हीच शिकवले  शहाणे  केले  !'

'अरे  आपण  काय  वाढवणार  व  शिकवणार  !'
त्याची  भविष्यातील  वाढ,  शहाणपणा जन्मजात त्याच्यात  संपृक्त  करून ठेवलेला  असतो.  आपण  फक्त  मददगार व्हायचे.
बी  ऊत्तम  रूजून परिपूर्ण  झाड  होण्यासाठी  आवश्यक  माती ,पाणी,  हवा  पूरवणारा कूशल माळी  व्हायचे  !!
माळी  कितीही  हूशार  , कूशल  असला  तरी  तो  आंब्याच्या  झाडाला अंजीर  नाही  उगवू  शकणार . पण  त्या आम्रवृक्षाची  ऊत्तम  निकोप  वाढ  होऊन  त्याला  दर्जेदार  आम्रबहर कसा  येईल  ! ही  व्यवस्था  मात्र  नक्कीच  करू  शकतो  !!

रसायन  शास्त्राच्या भाषेत  सांगायचं तर आपण  ऊत्पेरक ( Catalyst  )  भूमिकेत असावं .

आणि  एकदा  का  हे  समजल  की  मग  लाखो  रूपये  घेवून  मेडीकल  entrance, NEET,  CET, JEE  आय.आय.टी  यन्स जन्माला  घालू  असे सांगणारी  कोचिंगच्या दूकानदारीला थोडा  बहूत  तरी पायबंद  बसेल. ...
मग कोण  होताय तूम्ही  ?? कूंभार, शिल्पकार  की  माळी

Choice  is  yours, will  change  the  future

माझी  लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

 संपर्क 9967766451

What's App वर प्रतिसाद जरूर कळवा 

टिप  ::वरील  मते  व्यक्तिगत असून  मतमतांतरे  असू  शकतात  त्या  सर्वांचे  स्वागत  व  आदर  राखून

 

Monday, 30 May 2016

काय भूललासी वरलीया रंगा

काल  परवा  अचानक  पणे     what's app वर  एक  विनोद  वाचनात  आला......नंतर अनेक  ग्रूपवर  आला म्हणजे  viral   झाला होता .

भाऊ  कदम  मूलगी  पहायला  जातो  मूलगी  काळी  असते  तर  मूली चा बाप  कार  द्यायला  तयार  होतो
त्यावर  मूलगा  म्हणतो  तूमच ठीक  आहे  पण  आमच्या  पूढील  पिढीत  मूलगी  खपवायला  आम्हाला  हेलिकॉप्टर  द्यावे  लागेल  त्याचे  काय  ?

साधारण  अशा  आशयाचा  हा विनोद..
खर  तर  विनोद  हा विनोद  म्हणूनच  घ्यावा  हे  माहीती  असूनही  माझ्या  सारख्या  विनोदी  माणसालाही यावर  हसू आले नाही .
कूठेतरी  हा विनोद मन  विषण्ण  करून  गेला.

गोरा  ईंग्रज जाऊन  काही  तप  गेली  तरी  गोर्‍या  रंगाची  गूलामी मात्र  आमच्या  मानगुटीवरून  काही केल्या ऊतरायला तयार  नाही.

  गोरेपणाची  गूलामगिरी कूठेतरी  खोलवर घट्ट  रूजली गेली  ।

याची  सूरूवातच  जन्माअगोदर पासून  सूरू होते.
अमूक  तमूक  खा  ग   बाई   ... दूध केशर  घे  ...बाळ  कस  गोरगोमट  होईल  हं. ...

खरं तर  मूलगाच हवा..... पण  मूलगी  झाली तर  मात्र  सूंदर  गोरीपानच  हवी  हो  !

पाळण्यात  असताना  कमेंट  आल्या " व्वा !!  काय  छान  गोरीपान  आहे हो मूलगी. """..

बालपणी  गाणं  कानावर  आले  गोरी गोरी  पान  फूलासारखी छान  दादा मला एक  वहीनी  आण. ..

तारूण्यात  कानावर  शब्द  आले  चांदी  जैसा रंग  है  तेरा ....सोने  जैसे बाल......

मी गोरी आहे म्हणजे नक्की  काय  आहे  ???

याच  ऊत्तर  मोठी  होत  गेले  आणि  कळत  गेल ...

समजायला लागली मला माझ्या गोरेपणाची किंमत...

रंग देहावरून फिरणाऱ्या ऊत्सूक नजरा. ..
सलगीसाठी धडपडणाऱ्या.....
प्रेमात पडणारी, ......मागे लागणारी पोरं....
घरचे,
बाहेरचे,
नातलग,
शिक्षक
सगळ्यांच्याच नजरेत  ' माझ्या ' आधी  दिसणारा माझा 'गोरेपणा'
सगळ्यात  आधी  अधोरेखित  होणारा

मी गोरी आहे म्हणजे काय आहे?

मैत्रिणी म्हणतात,

"तुला नाही कळणार काळेपणाची दुःखं !!!!

"टीव्हीवर दिसणाऱ्या गोऱ्या रंगासाठी  होणार्या  हजारो  कोटींच्या  ऊलाढालीच्या   बाजाराला.....क्रीम  ऊपाय  जाहीरातीःना  ठेवू नकोस नावं.....

दररोज  नवीन  अॅडव्हान्स फार्मूला  सह  काही दिवसापासून  ते  आठवड्यात   गोरेपणाची  हमी  देणारी हमखास  ऊत्पादने....
आमच्यासाठी  वेड्या आशेचा   किरण  असतात ग. . ......त्यात  घरगुती  नूस्के ...नो  साईड  ईफेक्ट  वाला आयूर्वेद  ही  मागे  कसा राहील ...

गोरेपणाला कधीच  नसत  दूःख.....
नसतो  कसला  त्रास ...
या  ऊलट
"अग लग्नाच्या बाजारात  सगल्यात जास्त  तूझाच भाव..""

खरच .....

मी गोरी आहे म्हणजे काय  ?????

माझ्या रक्ता मांसावर चढलेली एक त्वचा.....
फक्त  त्वचा ....
आई बाबां कडून वाहून आलेले जीन्स.....
या उपर माझं कर्तृत्व काय ?......
शून्य. ..

पण तसही ते  कतृत्व बघायचे आहे कुणाला    ???

माझी कातडीच सगळ सांगते....

का   ???
ईतर  रंगाच्या  त्वचेखाली... भावना , प्रेम , ओढ , काम भावना' शृंगार. ..  गूणवत्ता, कर्तृत्व  काही नसेल.??.  की कमी असेल. ..??.

पण  याचा विचार  कोणाला करायचाय. ..

मग मी गोरी आहे म्हणजे नेमकं काय आहे??

कुणास ठाऊक??

मी नक्की कोण आहे?

गोरी बाई,
काळी बाई,
सावळी बाई
की नुसती बाई  
हो  हो  नूसती  बाई ....

माणुस नाही ...आधी बाई...

माझ्या कातडीच्या रंगा वरुन...
त्यांना,
ह्यांना,
ह्याला,
त्याला
सगळ्यांनाच्
काहीतरी म्हणायच असत ...सतत..

तू गोरी ना म्हणून...
तू काळी ना म्हणून...
तू सावळी ना म्हणून...

मग होते हळूहळू सवय या 'म्हणून' ची

आणि तिला ही चढतो कैफ तिच्या रंगाचा
केव्हा मग होते ती दुःखी तिच्याच रंगामुळे..

कोणी विचारतं का तुझा बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर
यांच्या कातडीचा रंग कसा आहे...

छे ! !  छे ! ! काहीतरीच  काय ?
आजिबात अस  काही विचारायचं नसतं...
कारण या मातीसाठी
पुरुष कर्तृत्व असतो आणि स्त्री फक्त  भोग...

काळा  फळा ..........हवा
काळा  पैसा. ..........हवा
काळी  माती........... हवी
काळे  ढग ............. हवेत
काळी  तिट............. हवी
काळे  डोळे ............  हवे
काळा  विठ्ठल ......  हवा
काळा  कृष्ण  .........हवा
पण ...........
पण  ........पण
राधा  मात्र  गोरीच हवी ........
तेच  तिचे कर्तृत्व. .......
तीच  गूणवत्ता. ........

किती करकचुन बांधून टाकले आहे
आपण आपल्यालाच...

मग सौंदर्य दिसत नाही....
आनंद दिसत नाही, ...
कर्तृत्व दिसत नाही....
दिसतो फक्त रंग.....

काळा...सावळा...
नाहीतर गोराही !!

शिवाय नोकारीतही म्हणे तुम्हाला
मिळते विशेष वागणूक..
तुला हवीये की नकोय हा मुद्दाच नाहिये...

पुरुषांना ही हव्या असतात गोर्‍या बायका
का तर वंश पुढे निघेल गोरा  !!

खरच  जर  फक्तं  गोरेपणात सौंदर्य  असत  तर  प्राचीन  मंदिरावरील  कमनीय  सौदर्यवतींची शिल्पे फक्त  संगमरवरी  दगडात असती  पण  ती  कोरली  गेली काळ्याशार  गंडकी पाषाणात. ..आजही मन  मोहीत करतात. ....

मग  जिवंतपणी  ही  फक्त  गोरेपणाची  अपेक्षा  व  सावळयाची उपेक्षा  ही  कसली मानसिक  गूलामगिरी की विकृती. ...

आफ्रिकन  आमच्या ईथे  येतो तेव्हा  तो निग्रो  असतो या ऊलट  एखादा  भिकार गोर्‍या  कातडीचा  जरी आला तर  तो  परदेशी  नागरीक   (foreiner ) ठरतो  ही कोणती  बौद्धिक  दिवाळखोरी .

आणि  संत  चोखामेळा सहज  आमचे कान  टोचून  जातात

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||

नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||

चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||

संदर्भ

डोंगा  - वेडा वाकडा  / वळणदार
कमान - धन्यूष्य
तीर  - बाण


🌈माझी लेखनयात्रा

Saturday, 2 April 2016

"एका शेवटाची सुरूवात "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

मूलींचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून परत येताना रस्त्यात आंब्याचे झाड दिसले.
" बाबा कैरी हवी " या बालहट्टात सामील होऊन दगड भिरकावून कैर्‍या पाडल्या व  "वज्रेश्वरी" गावातील  माझ्या खोडकर दिवसांची आठवण झाली.

"बाबा  ह्या झाडाला आपण कधी पाणी दिले नाही की याची निगा घेतली  नाही  की  काळजी घेतली नाही; या ऊलट दगड मारून दूखवलेच त्याला; तरीही त्याने न रागावता आपल्याला कैर्‍या दिल्या."
"मग ज्या ' मनूष्यप्राण्याने ' आपल्या मूलाबाळांवर प्रेम केले त्यांच्या साठी "आयूष्य "वेचले त्यांच्या वाट्याला 'वृद्धाश्रम' का हो ? "

तिच्या प्रश्नातच  मला  ऊत्तर दिसले. "मनूष्य" फार कमी काळ "मनूष्या"सारखा वागतो, आणि  जास्त वेळ " प्राण्या"सारखाच असतो  !  पंखात व पंजात बळ  येण्या पूरतीच प्राण्यांमधे कुटुंब  व्यवस्था  असते.  म्हणूनच  "मनूष्यप्राणी"  हेच  संबोधन  सूचक  होते .

"बस झालं  रे  परमेश्वरा,  ने  आता  !"
"नाही  सोसवत रे आता !! बोलव  रे,  लवकर !!"

अशा अर्थाची  वाक्य दिवसात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपल्या कानी पडतात. तरीही हा क्षणिक वैताग, त्रास, बाजूला ठेवून प्रत्येक जण जगत असतो. ....तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी जगण्यास प्रवृत्त करतात. ? ? ?

कर्तव्य,  जबाबदारी,  स्वप्न, नातीगोती, कुटुंब, प्रेम या  प्रयोजनांचे स्वरूप  आयूष्याच्या  वेगवेगळ्या  टप्प्यांवर  बदलत  जाते.

पण  आयूष्याच्या  संध्याकाळी  तीव्र  जीवनेच्छेचे  ठोस  कारण नसले  तर  ही  संध्याकाळ फारच  तप्त  होते  , जीवाची  काहीली  करते .

आपण  निरूपयोगी ; कुटुंबावर  भार ; घरात  अडचण  म्हणून  तर  राहणार  नाही  ना  ???
हा  विचार  अस्वस्थ  करतो.

"गात्र" शिथिल  होत  जातात  अन  "त्रागा" वाढत  जातो  .

'आम'च्या  वेळी  असं नव्हतं  !!
'आम'च्या ईथे  नव्हते  हो  चालत  असलं !
'आम'च्या  कुटुंबात  नाही हो  ह्या  पद्धती  !
'आम'च्यात  नाही असे  काही  !!

हा " आमवात  " बळावत  जातो  व जनरेशन  गॅप  ची  " रूजवात " होते.

तारूण्याच्या ऐन  उमेदीत  ज्या  स्वप्नांच्या मागे  जीवाचे  रान  केले, करियर  च्या  मागे बेदरकारपणे  बेफाम  होऊन  धावताना प्रसंगी  मूल्यसंस्कार तूडवले गेले त्या  स्वप्नांचे  मोल आता  कवडीमोल   झालेले  पाहून  आता विषाद,  खेद,  खंत  ,उपेक्षा  याखेरीज  हाती काही लागत नाही.
नको  नको  म्हणत  टाळताना  नकळतपणे  समोर  ऊभा  ठाकलेला  " वानप्रस्थाश्रम " मानसिक, भावनिक, शारीरिक, व आर्थिक  रिकामपण  घेवून  येतो.
कर्तव्य , लोकलज्जा, प्रापर्टी   किंवा  प्रेमापोटी  काही  जण  जेष्ठांची जबाबदारी  घेतातही पण  ती  जबाबदारी  नूसतीच घेवून  चालत  नाही  ती  निभावणं  ही  गरजेचे  असते.

कृपया  जेष्ठांच्या मदतीची  याचना  करण्याची  वाट  पाहू  नका , त्यात  त्यांना  मेल्याहून मेल्यासारखे होईल. ....न मागता........हात  न  पसरताही त्यांचा  हात  हाती  घ्या. पैशाची  नव्हे  तर  सहवासाची  , सहप्रवासाची  मदत  करा. ऊत्तम  श्रोता  व्हा  ! ! त्यांना  बोलण्याची  संधी  द्या. जगण्यात  जीवन  येईल त्यांच्या.

हे  करत  असताना  एक  महत्त्वाची  गोष्ट  करा ते  म्हणजे  आज  तूम्हाला  वयोवृद्धा  कडून  जी  अपेक्षा  आहे, त्यांच्या  ज्या  गोष्टीचा  त्रास  होतोस  ,ज्या  गोष्टीची  अडचण  होतेय  अस  वाटत. ..ती  मात्र  लक्षात ठेवा. ......कारण  तूम्हीही  वानप्रस्थाश्रमात
जाणार  आहात  निदान  पूढील  गृहस्थाश्रमींना  तरी  फायदा  होऊल त्याचा .
कारण  अंतिम  आनंदयात्रेनंतर जर  ,"बर  झालं  सूटले एकदाचे, "हे  हळहळणारे शब्द  जगलेल्या  आयूष्याचा  पराभव  करतात.

"काय  हे  बाबा,  किती कठीण  लिहिले आहे , मला कळेल  असे सोपे  सांगा  ना  जरा "

माझ्या  सातवीत  असणार्‍या  ऋचा ची  तक्रार  वजा  सूचना.

ठीक  तर  एक  गोष्ट  ऐक
आटपाट  नगरात  एक  विचित्र  कायदा  होता  कोणताही  राजा  फक्त  एक  तप  ( बारा  वर्षे ) राज्य  करेल त्या  मूदतीनंतर त्यांची  रवानगी  नगरीच्या  नदीच्या  पल्याड असलेल्या  निर्जन,  भयाण  हिंस्र  श्वापदे  असलेल्या  अरण्यात  केली  जाईल.

मूदत पूर्ण  होताच  आजपर्यंत  प्रत्येक  राजाला  जबरदस्तीने  नावेत  बसून  न्यावे  लागे. ....ते  ओरडायचे  रडायचे  विनवण्या  करायचे  पण  प्रजा  नियमाला  बांधिल होती.

पण  आज  मात्र  विलक्षण  घङत  होते  राज्यकारभाराची  मूदत पूर्ण  करून  राजा योगेंद्र  अतिशय  आनंदात , प्रसन्न चित्ताने,  स्वखुशीने  नावेतून पलिकडे  निघाला  होता. प्रजा  आश्चर्यचकित  होऊन  हा  निरोप  समारंभ  पहात  होती.

नावेच्या  नावाड्यासाठीही  हे  सर्वस्वी  नवीन  होते.
न  राहवून  तो  राजाला  म्हणाला ,

," राजन  आजपर्यंत  तूमच्या  ईतक्या  समाधानाने  राजीखूशीने या  शेवटच्या  प्रवासाला  कोणीच  निघाले  नाही. "
"आपल्या  शांत  असण्याचे  रहस्य  काय  ? ??" "आपणास  त्या  निबिड  , भयाण  जंगलाची  भीती  नाही  का  वाटत  ? "

राजा  उत्तरला, " अजिबात  भीती  नाही  वाटत  मला. गादीवर  बसतानाच मला  माहीत  होते  की  एक  दिवस  मला  त्या  भयाण  अरण्यात  जावेच  लागणार  आहे.

आदर्श राज्यकारभार करताना  मी  एक मात्र  केले  पलिकडच्या  अरण्यावर  पण  लक्ष दिले .माझ्या  कालावधीत  मी  तेथे  नंदनवन  फूलवले .आता त्या  निर्जन  जंगलाची  मला  भीती  नाही  उरली. मी  कृतार्थ  आहे.

कारण  या  "शेवटाची"  मी  कधीच  "सूरूवात"  केली  होती .

  मंडळी आता  तूम्ही  तरूण  आहात,  निवृत्तीच्या अरण्याचा विचारच  काय  स्वप्न ही   कधी  पडत  नसेल . परंतू  हीच  योग्य  वेळ आहे  पलिकडे  आपल्यासाठी  नंदनवन  फूलवून ठेवण्यासाठी.

आजपासून  वानप्रस्थाश्रम  चे  नियोजन  करा

कोणाकडून  अपेक्षा  ठेवाल  तर  अपेक्षाभंगाच्या  दूखाची तयारीही  ठेवा .

महीन्याच्या  मिळकती मधील  एक  हिस्सा  बाजूला  ठेवा. समाजऋण फेडण्यासाठी.

पिढी दर पिढी वेगवान  होत  जाणार्या  आयूष्याच्या  गाडी  बरोबर  Adjust  व्हायला  शिका. किंवा Add  just  करा .

दिलेले काढू नका , केलेले  आठवू  नका.

असे केले  तर  "निवृत्ती " होईल  "प्रवृत्ती " व  ठरेल  "आवृत्ती " नित्य  नव्या  जीवनाची.

तर  मग  आजच  करूया  एका  शेवटाची  सूरूवात
मी  केलीय  तूमचं  काय  ?

योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे